मंगळवार, १८ जून, २०१३

मराठी माणूस विकतोय लंडनमध्ये वडापाव


परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना भारतीय पदार्थ मिळण्याची नेहमीच वानवा असते आणि झटकेपट पोट भरणारा गरमागरम वडा पाव म्हंटलं की, त्यांना मुंबईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण अशा खवय्यांसाठी एक खास खबर... याच वडा पावची चव आता अगदी सातसमुद्रापार साहेबांच्या देशात, लंडनमध्येही चाखता येणार आहे आणि तेही आपल्या खास मराठमोळ्या हॉटेलमध्ये.

'श्रीकृष्ण वडा पाव' या नावानेच लंडनमध्ये हॉटेल सुरू करण्यात आलं आहे आणि तेही एका मराठी माणसाने हे हॉटेल सुरू केल्याने त्याला खास 'मराठी तडका' असणार हे मात्र निश्चित. सुबोध जोशी आणि सुजय सोहनी यांनी १५ ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे हॉटेल सुरू केलं. २०१० मध्ये एक छोटसं स्नॅक्स बार त्यांनी सुरु केलं होतं. पण अल्पावधीतच भारतीय खवय्यांनी या स्नॅक्स बारला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. भारतीयांचा मिळालेल्या ह्या पाठिंब्याचा जोरावर त्यांनी रेस्टॉरंट देखील उभारलं आणि आता तर लंडनमधील हॅरो शहरातही दुसरं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. 'मराठीमोळी टीम' असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये तुम्हांला अस्सल मराठी पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे आणि त्यात सगळ्यात खास पदार्थ म्हणजे वडा पाव. या रेस्टॉरंटमध्ये फक्त एक युरो मध्ये तुम्हांला वडा पावचा आस्वाद घेता येईल. पण फक्त वडा पावच नव्हे तर बटर वडा पाव, शेजवान वडा पाव अशा वेगवेगळ्या चवीतही वडा पाव उपलब्ध आहे. वडा पावसोबतच अनेक भारतीय पदार्थ येथे तुम्हांला मिळू शकतात. मेनू कार्डवर नजर टाकल्यास तुम्हाला दिसूनही येईल की, परदेशी पदार्थांना येथे कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही.

पुरणपोळी सारख्या अस्सल मराठी पदार्थासोबतच इतर भारतीय पदार्थही तुम्हांला मिळणार आहे. म्हणजे पंजाबी, साऊथ इंडियन, गुजराती अशा पदार्थांची अक्षरश: रेलचेल आहे. खास चाट म्हणजे झणझणीत तिखट अशी पाणीपुरी देखील मिळेल. या रेस्टोरंटमुळे लंडनमधील खवय्यांची भारतीय पदार्थ चाखण्याची गैरसोय दूर झाली आहेच पण परदेशी खवय्येही ही या रेस्टॉरंटकडे वळतील असा विश्वास अनिवासी भारतीयांना बोलून दाखवला आहे.

मंगळवार, २१ मे, २०१३

मराठमोळ्या इशानंमुले फक्त 30 सेकंदात तुमचा मोबाईल चार्ज

दिवसभर कामाच्या धावपळीत असणा-यांसाठी मोबाईल किती गरजेचा आहे हे सांगायला नको...मात्र इंटरनेटपासून सगळ्या गोष्टी मोबाईलवर वापरणा-यांसाठी व्याप असतो तो वेळ काढून मोबाईल चार्ज करण्याचा...पण तुमचा स्मार्ट मोबाईल फोन फक्त 20 सेकंदात चार्ज होईल असं तुम्हाला कुणी सांगितलं तर... 
अर्थातच तुमचा विश्वास बसणार नाही पण हे शक्य केलं आहे कॅलिफोर्नियात राहणा-या मराठमोळ्या इशा खरेनं....फक्त 20 ते 30 सेकंदात तुमचा मोबाईल पूर्णपणे चार्ज करु शकेल अशा सुपर कपॅसिटर उपकरणाचा शोध लावलाय 18 वर्षीय ईशा खरेनं...भारतीय-अमेरिकन असलेल्या ईशाला तिच्या या शोधासाठी इंटेल फाऊंडेशनच्या `यंग सायंटिस्ट अवॉर्ड`ने गौरवण्यात आलंय. या कामगिरीबद्दल तिला इंटेलकडून 50 हजार डॉलर्सचं पारितोषिक मिळालं आहे...त्याशिवाय टेक्नॉलॉजी क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या गूगलनेही तिच्या या क्रांतीकारी संशोधनाची दखल घेतलीय. 
ईशाच्या या उपकरणाचं आयुष्य 10 हजार चार्ज-रिचार्ज सायकल एवढे आहे. सध्या या कपॅसिटरच्या चाचण्या सुरु आहे...लवकरच तो मोबाईल आणि अन्य उपकरणांसाठी वापरता येणार आहे....

कसा आहे सुपर-कॅपॅसिटर? 

अत्यंत लहान आकाराचा हा सुपर-कॅपॅसिटर एनर्जी स्टोरेज डिव्हाइस असून तो मोबाइलच्या बॅटरीमध्ये बसवता येतो. अत्यंत कमी जागेत भरपूर ऊर्जा साठवून ठेवण्याची, चटकन चार्ज करण्याची क्षमता ही या सुपर-कॅपॅसिटरची वैशिष्ट्ये आहेत.

शनिवार, ११ मे, २०१३

करोडपतीचं मराठी स्वप्न!


छोटा पडदा आता इतका मोठा झालाय की, त्याने सर्वसामान्यांचं जीवनच व्यापून टाकायला सुरुवात केलीय. त्याला वेगवेगळी स्वप्नं दाखवायला सुरुवात केलीय. मग ते आपल्यात दडलेले कलागुण दाखवून मशहूर होण्याचं स्वप्न असो की, नशिबाचे अचूक फासे टाकून आपलं आयुष्य बदलून टाकण्याचं स्वप्न असो. असंच करोडो रुपये जिंकण्याचं एक स्वप्न दाखवलं ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाने. ‘हू वॉण्टस् टु बी अ मिल्येनर’ या सर्वप्रथम ब्रिटनमध्ये छोटया पडद्यावर अवतरलेल्या आणि गाजलेल्या टीव्ही शोची ही भारतीय आवृत्ती. जगभर लोकप्रिय ठरलेला हा कार्यक्रम आता मराठीत आलाय. ‘ई टीव्ही’ मराठीवर ‘कोण होईल मराठी करोडपती’  करोडो रुपये कमावण्याचं स्वप्न आता मराठी साज लेवून घेऊन साकार होणार आहे.
              श्रीमंत व्हावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु श्रीमंत होण्यासाठी काहीही करायची तयारी असली तरी सगळ्यांनाच काही श्रीमंत होता येत नाही. कारण श्रीमंतीचा काही पुस्तकी मंत्र नसतो. परंतु तशी संधी एखादा टीव्ही कार्यक्रम पाहून मिळत असेल, तर श्रीमंत होण्याचा याहून सोपा मार्ग कुठला? काही वर्षापूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’ने पहिल्यांदा प्रेक्षकांना करोडपती होण्याचा हा मार्ग दाखवला.

तो सोपा नव्हताच. कारण तिथे पणाला लागणार होती बुद्धिमत्ता. थोडासा नशिबाचा भाग आणि ही बुद्धिमत्ता यांची सांगड ज्यांना साधली त्यांच्यासाठी हा मार्ग भाग्योदयाकडे घेऊन जाणारा रस्ता ठरला. केवळ काही प्रश्नांची उत्तरं देऊन हा भाग्योदय करणा-या या कार्यक्रमाने साहजिकच लोकप्रियतेचीही ‘श्रीमंती’ मिळवली.

खरं तर ‘सोनी’ चॅनेलवरून सादर होणारा हा कार्यक्रम ‘हू वाँण्टस् टु बी अ मिल्येनर’ या मूळ ब्रिटनच्या कार्यक्रमाची भारतीय आवृत्ती होती. १९९८ साली ‘सोनी पिक्चर्स असोसिएशन’ या ब्रिटिश कंपनीने या अभिनव आणि अत्यंत वेगळ्या टीव्ही शोची निर्मिती केली. ४ सप्टेंबर १९९८ या दिवशी तो ‘आय टीव्ही’ या वाहिनीवरून पहिल्यांदा प्रसारित झाला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुढे तो जगभरातल्या अनेक देशांतील छोटया पडद्यावर अवतरला. आजवर वीसहून अधिक देशांमध्ये ‘हू वॉण्टस् टू बी अ मिल्येनर’ या कार्यक्रमाचे देशी अवतार सादर झालेत.

भारतात ‘कौन बनेगा करोडपती’चं पहिलं सत्र २००० साली भारतात सादर झालं. सूत्रसंचालकाची भूमिका अमिताभ बच्चन यांनी पार पाडली. अमिताभ बच्चन यांचं अनौपचारिक तेवढंच बुद्धिशाली सूत्रसंचालन या कार्यक्रमाचा युएसपी ठरलं. हर्षवर्धन नवाथे या मराठी तरुणाने ‘कौन बनेगा करोडपती’चा पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला. आपल्या पहिल्याच सत्रात या कार्यक्रमाने टीआरपीचे सर्व विक्रम मोडले. हर्षवर्धन नवाथेचा एपिसोड सादर झाला त्या त्यादिवशी तो कोटीमोलाच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर काय देणार, याची सगळ्यांना उत्सुकता होती. (‘स्लमडॉग मिल्येनर’ या चित्रपटात ही वातावरणनिर्मिती छान करण्यात आली आहे.) शेवटच्या प्रश्नाचं उत्तर हर्षवर्धनने दिलं, तेव्हा अमिताभ म्हणाला होता ‘यु मेड हिस्ट्री’.

मराठी तरुणाने लिहिलेल्या इतिहासाची आता पुनरावृत्ती होणार आहे. कारण ‘हू वॉण्टस् टु बी अ मिल्येनर’ किंवा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाची मराठी आवृत्ती झळकणार आहे. ‘कोण होणार मराठी करोडपती’ या नावाने ६ मे पासून हा कार्यक्रम ‘ई टीव्ही’ मराठी वाहिनीवर दिसणार आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मराठी सिनेमाचा सुपरस्टार सचिन खेडेकर सांभाळणार आहे.

‘कोण होईल मराठी करोडपती’चं स्वरूप मूळ कार्यक्रमाप्रमाणेच असून यातले प्रश्न मात्र मराठीत विचारले जाणार आहेत. मराठी लिहिता-वाचता येणा-या कुणालाही या कार्यक्रमात भाग घेता येईल. प्रश्नांच्या टप्प्याप्रमाणे पाच हजारांपासून ते एक कोटी रुपये स्पर्धकाला मिळतील. हिंदी कार्यक्रमात लोकप्रिय झालेल्या काही शब्दांसाठी मराठी प्रतिशब्दही तयार करण्यात आलेत. हा कार्यक्रम घडय़ाळाच्या काटय़ांवर चालत असल्याने त्याला ‘काटेकर काका’ असं नाव देण्यात आलंय.

बक्षिसाच्या रकमेच्या भाजणीला ‘पैशांचं झाड’, तर ‘लॉक कर दिया जाय’ऐवजी ‘शिक्का मारू?’ असा शब्द वापरण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या मदतीसाठी तीन लाइफलाइन अर्थात जीवनदायिनीही आहेत. परिचिताला फोन करून प्रश्न विचारण्याची ‘फोन अ फ्रेंड’ (मित्राची मदत) तसंच ‘फिफ्टी फिफ्टी’ (तळयात मळयात) ही जीवनादायिनीही आहे. प्रश्नाच्या उत्तरादाखल दिलेल्या चार पर्यायांपैकी दोन चुकीचे पर्याय निघून जाण्याची सोय आणि नेहमीचा ‘ऑडियन्स पोल’ म्हणजे ‘जनमताचा कौल’ही स्पर्धकाला घेता येणार आहे.

'गुगल ट्रान्स्लेटर' अखेर मराठीतही!

सर्बियन , व्हिएतनामीपासून कन्नड , तामिळ , बंगाली ,तेलगूपर्यंत भाषा समजून घेणा-या गुगल ट्रास्लेटरला मराठी का कळत नाही ? असा प्रश्न आजवर अनेकदा विचारला गेला. इंटरनेटवर त्यासाठी अनेकांनी मोहीमाही राबविल्या. या सर्व मागण्या अखेर पूर्ण झाल्या आणि गुगलची भाषांतर सुविधा असेलेले ' गुगल ट्रान्स्लेटर ' अखेर मराठीतही अवतरले. 

गुगल मराठी ट्रान्सलेटर 

मराठीसह बोस्नियन , सेबियानो , हमाँग , जॅव्हेनिज या पाच नव्या भाषांसह एकूण ७० भाषांमध्ये गुगल ट्रान्स्लेटर म्हणजेच गुगलची भाषांतर सुविधा सज्ज झाली आहे. गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगमधून त्याची घोषणा केली असून , मराठीसाठी अद्यापही ही सुविधा प्रथामिक स्थितीत असल्याचेही कबूल केले आहे. 

या आधी बंगाली , गुजराती , हिंदी , कन्नड , तामिळ , तेलगू , उर्दू या भारतीय भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध होती. पण जगभरातील सुमारे सात कोटी तीस लाख लोक जी भाषा बोलतात ती मराठी मात्र गुगल ट्रान्सलेटरवर उपलब्ध नव्हती. आपली ही कमतरता गुगलने भरून काढली आहे. आता ' गुगल ट्रान्स्लेटर ' वर मराठीतून अन्य ६९ भाषा किंवा त्या ६९ भाषांमधून मराठीत भाषांतर करता येणे शक्य झाले आहे. 

अन्य भाषांप्रमाणेच मराठीत होणारे हे भाषांतर किंवा मराठीतून होणारे भाषांतर अचूक नाही. अद्यापही ही सुविधा प्राथमिक अवस्थेत असल्याने अचूक असण्याची अपेक्षा करणे बरोबर नाही. पण किमान ही सुविधा सुरू होणे महत्त्वाचे होते. आता ती अचूक करण्याची जबाबदारी मराठीप्रेमींनीही उचलावी , अशी गुगलची अपेक्षा आहे. 

आजही अनेक वाक्यांचे मराठीकरण करताना किंवा मराठी वाक्यांचे अन्य भाषेत भाषातंर करताना अनेक गमतीजमती होत आहेत. मराठी म्हणी आणि वाक्प्रचारांचे भाषांतर म्हणजे ' चकटफू हसवणूकीचा कार्यक्रम ' आहे. पण यात दुरुस्ती स्वीकारण्याची तयारी गुगलने दाखवली आहे. 

त्यासाठी त्यांनी ट्रान्स्लेटर टूलकिट आणि शो फ्रेजबुक असे दोन पर्याय दिले आहेत. तसेच ज्या शब्दांचे भाषांतर होत नसेल त्यावर ' क्लिक ' करून ते भाषांतर गुगलकडे पाठविण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधांचा जेवढा वापर वाढले तेवढे हे भाषांतर अधिक अचूक होईल. एकाच शब्दाचे विविध समनार्थी पर्यायही सुचविण्यात आले आहेत. उदाहरणार्थ water या इंग्रजी शब्दासाठी जल , समुद्र , पाणी पाजणे असे पर्याय दाखविण्यात येतात. अर्थातच त्यातही त्रुटी आहेत. पण गुगलला उशिरा का होईना सुचलेल्या या शहाणपणाचे स्वागत करायला हवे , असे इंटरनेट क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

अ‍ॅनिमेटेड प्रभो शिवाजी राजा

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं विलक्षण कर्तृत्व अ‍ॅनिमेटेड चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांसमोर येतंय. इन्फिनिटी व्हिज्युअल्स व मेफॅक यांनी ‘प्रभो शिवाजी राजा’ या शंभर मिनिटांच्या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हा अ‍ॅनिमेटेड चित्रपट वास्तव वाटावं यासाठी गेल्या दोन वर्षापासून या टीमने अपार कष्ट घेतलेत. सचिन खेडेकर यांच्या ओघवत्या शैलीतल्या निवेदनातून हा चित्रपट उलगडत जाणार असून यात महाराजांच्या जीवनातले अनेक महत्त्वाचे टप्पे दाखवण्यात आले आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली निनाद बेडेकर यांनी या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे.या चित्रपटाचं वैशिष्टय म्हणजे, डच चित्रकाराने त्या काळात काढलेल्या महाराजांच्या मूळ चित्राबरहुकूम महाराजांची अ‍ॅनिमेटेड व्यक्तिरेखा तयार करण्यात आलीय. चित्र व रेखाचित्र यांच्या परंपरागत अ‍ॅनिमेशनचा व संगणकीय अ‍ॅनिमेशन तंत्राचा सुरेख संगम या चित्रपटात पाहायला मिळेल, असा विश्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश मुळे यांनी व्यक्त केलाय. त्यांच्या चमूने तब्बल दोन वर्ष सतत मेहनत करून या चित्रपटाचं अनिमेशन अंतिम स्वरूप दिलंय. या चित्रपटासाठी यातल्या ३० महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची तब्बल पावणेतीन लाख चित्रं काढण्यात आली होती. तसंच नऊ हजारांहून अधिक पार्श्वभूमींचा वापर करण्यात आलाय. पडद्यावर काही सेकंद दिसणारी फ्रेमही परीपूर्ण असावी, असा प्रयत्न या चित्रपटासाठी करण्यात आलाय. भरत बलवली यांनी या चित्रपटाच्या पार्श्वसंगीताची बाजू सांभाळली असून कवी भूषण यांच्या कवितांचाही समावेश करण्यात आला आहे. हा चित्रपट केवळ लहान मुलांनाच नव्हे तर मोठयांनाही आनंद व प्रेरणा देऊन जाईल, असा विश्वास या चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केलाय.

गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

बिहारच्या तरुणाईचे आयकॉन मराठमोळे अधीक्षक शिवदीप लांडे



पोलिस अधीक्षक शिवदीप लांडे  
 
बिहार पोलिस दलात कार्यरत एका मराठमोळ्या तरुणाने सध्या केवळ बिहार सरकारचे नव्हे, तर देशाचे लक्ष वेधले आहे. बिहार पोलिस दलातील पोलिस अधीक्षक शिवदीप लांडे हे बिहारच्या तरुणाईचे आयकॉन ठरले आहेत. एकीकडे प्रांतवादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना बिहारमध्ये मराठी अधिकाऱ्याची बदली रद्द व्हावी म्हणून स्थानिक रस्त्यावर येतात. आंदोलनाची भूमिका घेतात ही शिवदीप लांडे यांच्या कर्तव्यदक्षतेची पावती आहे... 
बिहारमध्ये एका कर्तव्यकठोर मराठी पोलिस अधिकाऱ्याने शिस्तीचा बडगा उभारावा आणि त्याला जनतेची साथ मिळावी ... इतकी की त्यांची बदली झाल्यावर ती रद्द करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरावेत, हे एकूणच अजब आहे. बिहार पोलिस दलातील पोलिस अधीक्षक शिवदीप लांडे यांनी ही किमया करून दाखविली. 
शिवदीप लांडे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील पारस या गावचे. २० मे १९७६ रोजी जन्मलेल्या शिवदीप यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण याच गावात झाले. वडील वामन लांडे हे शेतकरी. कुटुंबाची परिस्थिती खूप चांगली नव्हती. शेगावच्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी बी. ई. ही पदवी संपादन केली. वेगळे कर्तृत्व दाखवायचे, असा त्यांचा आधीपासून ध्यास होता. आयुष्यात ' जरा हटके ' करण्याची इच्छा होती. त्यानुसार, पदवी शिक्षण घेत असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. सेल्फस्टडी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या बळावर त्यांनी यूपीएससीमध्ये उज्ज्वल यश मिळविले. आयपीएससाठी रँकिंग मिळविले. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २००६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची बिहार केडरमध्ये नियुक्ती झाली.  त्यांचे पहिले पोस्टिंग माओवादाचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यात झाले. माओवादाचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी व्यापक मोहीम राबविली. लांडे यांच्या या धडाकेबाज कामामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नितीशकुमारांच्या अजेंड्यावरच होता. याच धोरणातून लांडे यांना त्यांनी राजधानी पाटणा येथे आणले. पाटण्याला पोस्टिंग मिळताच लांडे यांनी माफियाराज, अपहरण, खून, छेडखानी करणा‌ऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली. दहा महिन्यांत त्यांनी तेथील अनेक टोळ्यांचा बंदोबस्त केला. वाहतूक शाखेचे एसपी म्हणूनही त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी होती. त्यामुळे वाहतुकीची शिस्त काय असते? हे त्यांनी जनतेला दाखवून दिले. अन्यायाविरुद्ध रोखठोक भूमिका घ्यायची आणि सामान्य नागरिकांना निर्धास्त करायचे असा जणू वसा त्यांनी घेतला. सुरुवातीला काहींना ही स्टंटबाजी वाटली. पण लांडे यांना स्वत:वर विश्वास होता. काही दिवसांत स्थानिकांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटू लागला. हा विश्वास दृढ झाला आणि प्रचंड शिस्त व आक्रमक कार्यपद्धतीमुळे एखादा चित्रपटातील नायक जसा लोकप्रिय ठरतो, तसे शिवदीप लोकप्रिय ठरले. त्यांची ही लोकप्रियता तरुणांमध्ये अधिक आहे. इतकी की दररोज त्यांना ' ला‌इक ' करणारे सुमारे ३०० मेसेज मिळतात. त्यांची पाटण्याहून बदली झाली. ही बदली रद्द करा म्हणून बिहारी नागरिक रस्त्यावर आले. खुद्द मुख्यमंत्र्यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. कर्तव्य पार पाडताना लांडे सामाजिक बांधिलकीही जपतात. वेतनातील ७० टक्के रक्कम गरीब मुलींचे विवाह करून देणाऱ्या संस्थेला ते नियमित देतात. परप्रांतातून महाराष्ट्र कॅडरमध्ये आलेले अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी महाराष्ट्रातील अनेक गुन्हेगारी प्रभावित जिल्ह्यांमध्ये काम करण्यास इच्छुक नसतात. त्यांच्यासाठी लांडे यांच्यासारखे अधिकारी आदर्श ठरावे.

                    मराठह्यांड तफ़्रे लांडे पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

सचिनला त्रिवार अभिवादन

आता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी... 
सचिन आता राज्यसभेत खासदार आहे. या नव्या भूमिकेतील योजनांविषयी सचिन म्हणतो, "खासदार निधीचे पैसे योग्य कामी कसे वापरायचे, याचा विचार माझ्या मनात घोळत असतो. येत्या काही दिवसांत मी विदर्भातील शेतकऱ्यांसाठीही काम करणार आहे. तसेच, ज्या गावात वीज नाही, तिथे हे "सोलर लॅंप' देणार आहे. पण हे काम माझ्या एकट्याने होणाऱ्यातले नाही. मला तुमच्या सर्वांच्या सक्रिय सहभागाची, मदतीची नितांत गरज आहे. लवकरच आम्ही या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करून लोकांना या चांगल्या कामात सहभागी कसे होता येईल, याचा आराखडा जाहीर करणार आहोत.'' 
वेळ मिळाला, की मी वेळुंजे गावात जाणार आहे. तिथल्या ग्रामस्थांना मला भेटायचे आहे. इतकेच नाही, तर एका रात्रीचे जेवणही त्यांच्याबरोबर करायचे आहे. हे माझे कोरडे आश्‍वासन नाही. 
                                                                                                                            - सचिन तेंडुलकर